कळवण l प्रतिनिधी : कळवण तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी साकोरे (ता . कळवण ) येथील शेतकरी गोरख देवरे यांच्या एक एकर शेतात काढून ठेवलेला कांदा पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात कांदा, मिरची व टोमॅटो पिकांचे अवकाळी पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. तालुक्यात मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतांना कृषी विभागाने ८० हेक्टर क्षेत्रावरील १२० शेतकऱ्यांचे कांदा, मिरची , टोमॅटो भाजीपाला यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. शासनाने संबंधित महसूल व कृषी विभागास पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत व नुकसानीचे पंचनामे करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी , अशी मागणी कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार नितीन पवार यांच्याकडे केली आहे.
हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला गेल्याने शेतकऱ्यांनी कांदा काढणीस लगबगीने सुरुवात केली होती. मात्र काढून ठेवलेला कांदा शेतातच काही शेतकऱ्यांनी झाकून ठेवल्याने व काढलेला कांदा शेतातच उघड्यावर असल्याने अचानक बुधवार व गुरुवार दि . ३ एप्रिल २०२५ रोजी चार वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास साकोरे येथील शेतकरी गोरख आबा देवरे यांचा सुमारे एक एकर शेतातील काढून ठेवलेला कांदा पूर्णतः पाण्यात भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची भिती शेतकरी देवरे यांनी व्यक्त केली आहे.
कळवण तालुक्यातील साकोरे, आठंबे , नाकोडे, पाटविहीर , रवळजी , खेडगांव , ककाणे , मोकभणगी , देसराणेसह पश्चिम पट्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला , तर तुरळक ठिकाणी गारांसह पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांचा शेतातील काढून ठेवलेल्या कांदा पावसामुळे पूर्णतः भिजला आहे. तर अनेक शेतकऱ्यांचा अर्धवट शेतात काढलेला कांदा झाकण्यासाठी यावेळी ताडपत्रींची जमवाजमव करण्यासाठी बळीराजाची अक्षरशः त्रेधातिरपिट उडाली होती. तर उघड्यावरील शेतीपिके वाचविण्यासाठी घरातील लहान मोठ्यांच्या मदतीने अक्षरशः तारांबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले होते. जोरदार वाऱ्यामुळे काढणी योग्य असलेल्या गहू पिकांचेही यावेळी नुकसान झाले आहे.
बेमोसमी पावसामुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने त्वरीत संबंधित विभागास द्यावेत , व तातडीने कांदा पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी , अशी मागणी कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार नितीन पवार यांच्याकडे केली आहे.