बोरगाव l प्रतिनिधी:- कळवण व सुरगाणा येथील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर अपुरी संख्या असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक हानी बरोबरच शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.आणि एकूणच या विभागातील अनागोंदी निषेध नोंदवण्यासाठी कळवण-सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार २८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता कोल्हापूर फाटास्थित प्रशासकीय इमारत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला टाळे (कुलूप) ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले. हे अंदोलन पाच तास सुरु होते. या आंदोलन प्रसंगी प्रशासनाने हलगर्जीपना केल्याने आमदार पवार संतप्त झाल्याने त्यांनी लेखी आश्वासन फाडत आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी कुठलाच तोडगा न निघाल्याने १०० टक्के शिक्षक मीळत नाही. तोपर्यंत सर्व निवासी विद्यार्थांना घरी घेऊन जा व शासकीय आश्रमशाळा बंद ठेवा असा निर्णय आमदार नितीन पवार व पालकांनी घेतल्याने अंदोलन चिघळले आहे.
दि. १६ जून पासून आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ जवळपास दोन महिने पासून नियमितपणे सुरु झालेले असून विद्यार्थी नियमितपणे शाळेत उपस्थित राहतात. बहुतांश आश्रमशाळेत रोज ९५ ते ९६ टक्के विद्यार्थी उपस्थिती आहे. परंतु बहुतांश आश्रमशाळेतील नियमित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदे रिक्त असल्याने विद्यार्थी गुणवत्ता, आरोग्य, संरक्षण शालेय कामकाज करताना अडचणी येत असल्याच्या समस्येकडे आज या आंदोलनाने आदिवासी विकास विभागाच्या प्रशासनाचे वेधले आहे.
जयश्री पवार जिपच्या माजी अध्यक्षा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार प्रत्येकाला उत्तम दर्जाचे शिक्षण मिळणे गरजेचे आहे. यासाठी माजी मंत्री स्व ए टि पवार यांनी शासकीय आश्रमशाळेच्या मोठमोठ्या ईमारती बांधुन जाळे कळवण, सुरगाणा तालुक्यात विणले आहे. असे असतांना प्रशासकीय आधिकार्याच्या उदासीनतेमुळे येथील आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे हि खेदाची बाब आहे. विद्यार्थि पालक यांनी वेळोवेळी प्रशासनाच्या हि बाब लक्षात आणून देऊन सुध्दा त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचा निषेध नोंदवलाच पाहीजे असे सांगीतले.
या आंदोलन प्रसंगी आमदार नितीन पवार, जिप माजी अध्यक्षा जयश्री पवार, आनंदा झिरवाळ, गोपाळराव धुम, हरीभाऊ भोये, सुदाम भोये, रघुनाथ महाजन, डि एम गायकवाड, राजु पवार, सरोज भोये, आदींनी मनोगत व्यक्तकरत शासकीय आश्रम शाळेतील अनागोंदी कारभारावर टीका करत शासकीय आश्रम शाळा बंद करण्याची मागणी केली . तर सूत्रसंचालन सुदाम भोये, तर प्रास्ताविक डी.एम. गायकवाड यांनी केले
या अंदोलनात पंचायत समितीचे माजी सभापती मधुकर जाधव, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र केदाजी हिरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, रायुका तालुकाध्यक्ष कुंदन हिरे, शहराध्यक्ष रोहित पगार, अनिल घोडेस्वार, राजु पवार, प्रभु जाधव, दळवटचे सरपंच लक्ष्मण पवार, आदिवासी शक्तीसेनेचे जिल्हाध्यक्ष सुदाम भोये, रिपाईचे बापु जगताप पुंडलिक खंबाईत, शशिकांत हिरे, यशवंत पवार, आदींसह शेकडो पालक, शालेय शिक्षण समिती पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
समाजासाठी आमदारकी पणाला लावु:- कळवण व सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी द्या या पालकांच्या मागणीकडे प्रकल्पधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज आंदोलनाची वेळ आली.प्रकल्पातील कर्मचारीवर अधिकारीचा अंकुश नसल्याने मुजोरपणा वाढला असून याची तक्रार आपण सरकारकडे करणार आहोत. सत्तेत आहे म्हणून आंदोलन करणे चुकीचे नाही.आदिवासी समाजासाठी आपली आमदारकी पणाला लावू, पोट तिडकीने समाजाचे प्रश्न सोडवू.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोकराव उईके यांची भेट घेऊन रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावणार आहे. आदिवासी विकास विभाग प्रशासनाने माझ्यासह अंदोलन कर्त्यांना लेखी आश्वासन देण्यास दिड ते दोन तास ताटकळत ठेवले. याचा निषेध करतो व त्यांच्या विरोधात विधानसभेत ह्क्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहे.
- आमदार नितीन पवार, कळवण
कळवण प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेत शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी पदे रिक्त असून मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षकांचे समायोजन करण्यात आले असून १५ ऑगस्ट पर्यंत नियमित शिक्षक अप्पर आयुक्त कार्यालयाकडून नियुक्त केले जाणार आहे. प्रकल्पात १०० शिक्षकेतर कर्मचारी अप्पर आयुक्त कार्यालयाने नियुक्त केले आहे.
- अकुनूरी नरेश, प्रकल्पधिकारी कळवण
चौकट - पालकांनी आदिवासी आयुक्तांना या समस्येबाबत १७ जुलैला निवेदन दिले होते या निवेदनात दहावी व बारावी इयत्तांसाठी गणित, इंग्रजी व विज्ञान या महत्वाच्या विषयांसाठी देखील शाळेत शिक्षक नाहीत. आश्रमशाळेत मनुष्यबळाअभावी विद्यार्थ्यांसाठी दोन वेळचे जेवण, नाश्ता, स्वच्छता, चौकीदारी आदि. कामे करणे खूपच बिकट अवस्था झाल्याचे नमूद केले होते. मात्र याकडे प्रशासनाने सोईस्कर रित्या दुर्लक्ष केल्याचे या अंदोलन वरुन दिसुन आले.