maharashtratribalnews

बिबट्याचा कायमस्वरुपी बंदोबस्त करा. माजी आमदार धनराज महाले यांची मागणी

दिंडोरी । मनोज पाटील
 दि. 29 दिंडोरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ होतांना दिसत आहे. त्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवीत हानी होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसह शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. गेल्या आठवड्यात वनारवाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात 21 वर्षीय तरुणीचा बळी गेल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे वनविभागाने याबाबत कठोर पाऊले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार धनराज महाले यांनी केली आहे. 
       यावेळी माजी आमदार धनराज महाले यांनी चव्हाण वस्तीवर जाऊन कुटुंबीय, नातेवाइकांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी माजी आमदार धनराज महाले यांनी सांगितले की, बिबट्याच्या दहशतीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. त्यात तालुक्यात अनेक ठिकाणी वाड्यावर राहणार्‍या कुटुंबांना महावितरण कंपनीकडून सिंगल फेज विजेची सोय नसल्यामुळे अंधाराचा सामना करावा लागत आहे. हे कुटुंब रात्रीच्या वेळी पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडू शकत नाही. कित्येक वेळा बिबट्या रात्री घरासमोर आला तरी लोक बाहेर पडू शकत नाही. एवढी दहशत बिबट्याने निर्माण केली आहे. ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचे वास्तव्य आहे. अशा ठिकाणची लहान मुले शाळेत जाण्यात सुद्धा घाबरतात. अनेक ठिकाणी शाळकरी मुलांवर बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना तालुक्यात घडल्या आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजर्‍यांची संख्या वाढवून ज्या ठिकाणी जास्त बिबट्याचे वास्तव्य आहे त्या ठिकाणी पिंजरे बसून त्यामध्ये भक्ष्य ठेवावे, जेणेकरुन बिबटे जेरबंद होवून बिबट्याचे वाढते हल्ले कमी होतील. तरी वनविभागाने यावर त्वरीत कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी आमदार धनराज महाले यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने