दिंडोरी l मनोज पाटील:- कादवा कारखाना व्यवस्थापनाकडे वारंवार मागणी करून देखील रुग्ण वाहिका व कामगारांना औषधोपचार उपलब्ध करून दिले जात नसून कामगारांच्या आरोग्यविषयक अनेक गंभीर समस्यांकडे कादवा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष झाले आहे. यासंदर्भात तत्काळ ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार संघटनेचे अध्यक्ष भगवान जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कादवा कारखान्याकडे गेल्या अनेक वर्ष रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी प्रलंबित आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी व कारखान्याच्या सभासदांनी देखील अनेक वेळ लेखी स्वरूपात मागणी केली आहे. मात्र कारखाना व्यवस्थापनाने याप्रश्नी वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले आहे. शिवाय कारखाना कार्यक्षेत्रावर कोणत्याही प्रकारची वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध नसल्याने कारखान्याच्या आत किंवा परिसरात एखादा अपघात झाल्यास रुग्णांना नाशिक, पिंपळगाव आदी ठिकाणी उपचारासाठी घेऊन जावे लागते. परिणामी रुग्णवाहिका उपलब्ध होऊ न शकल्याने अनेकवेळा कामगार तसेच सभासदांचे मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. सुमारे पन्नास वर्षापूर्वी स्थापन झालेली कादवा कामगार वसाहत देखील मरणासन्न अवस्थेत असून या ठिकाणी मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या खोल्यांमध्ये जीव मुठीत धरून कामगारांचे कुटुंब राहत आहे. या वसाहतीत देखील अनेक गंभीर आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्या आहे. या ठिकाणी सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. कारखान्याचे अध्यक्ष व संचालक मंडळाकडे वारंवार मागणी करून देखील कारखाना व्यवस्थापन यासंदर्भात कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनेने दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष भगवान जाधव, सरचिटणीस अजित दवंगे तसेच पदाधिकार्यांच्या सह्या आहे.