maharashtratribalnews

विहीरीत पडून शाळकरी मुलीचा मृत्यू; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे करंजाळीत हळहळ

सुरगाणा l प्रतिनिधी :- सुरगाणा तालुक्यातील करंजाळी येथील एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, तेरा वर्षीय सविता शिवाजी भोये या शाळकरी मुलीचा विहीरीत पडून मृत्यू झाला आहे. सविता निफाड तालुक्यातील मुखेड येथील आदिवासी आश्रम शाळेत सहावी इयत्तेत शिक्षण घेत होती.
     करंजाळी गावातील ठक्कर बापा योजनेअंतर्गत चार वर्षांपासून सुरू असलेली विहीर केवळ खोदूनच ठेवण्यात आली होती. संबंधित ठेकेदाराकडे ग्रामस्थांनी वारंवार विहीरीच्या अपूर्ण अवस्थेची तक्रार केली होती, मात्र कोणतीही कार्यवाही न झाल्याने ही विहीर नागरिकांसाठी धोकादायक ठरत होती.
      सविता ही शेतात जात असताना पाय घसरून विहरीत पडली व ती बुडून गेली. विहीर खोल असल्याने तिचा मृतदेह स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. तिला तातडीने सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पालक शिवाजी भोये यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले,
"करंजाळी गावात सुमारे चार वर्षांपासून ठक्कर बापा योजनेअंतर्गत केवळ खोदकाम करून विहीर अपूर्ण अवस्थेत ठेवण्यात आली आहे. या विहिरीत पूर्वीही अनेक वेळा जनावरे पडली आहेत. यावेळी माझ्या मुलीला जीव गमवावा लागला. संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे."

     या प्रकरणी प्रशासनाकडून सखोल चौकशी करून जबाबदार ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी गावकऱ्यांची जोरदार मागणी आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने