कोहोर । किसन ठाकरे:- शेतीची अवस्था सध्या परवडणारी राहिली नसल्याचे शेतकरी सांगत असल्याने नोकरीला प्राधान्य आले आहे. शेती ही तिसर्या स्थानी पोहोचली आहे. त्यात महागाई दिवसेंदिवस वाढत असून डिजेलचे दरही सध्या वाढलेलेच आहेत. त्यामुळे पीक घेणे सोडा मशागत करणेही वरचेवर कठीण होत चालले आहे, असे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.
आधुनिक युगात शेती व्यवसाय करताना बैलजोडी सांभाळणे अवघड होत आहे. कारण बैलांना चारा विकत घेणे शेतकर्यांना परवडेना झाले आहे. तर दुसरीकडे कडबा व पेंडीचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे उसनवारी करूनच शेतकरी यांत्रिक शेतीला प्राधान्य देताना दिसत आहेत. त्याचवेळी ग्रामीण भागात पाणीटंचाई असल्यास त्यात अधिकची भर. अशातच शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करीत कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. यामुळे काही शेतकर्यांच्या अंगणात दिसणार्या बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टर सारख्या यंत्रांनी घेतली असून नांगरणी, पेरणी, कोळपणी व इतर शेती मशागतीचे कामे पारंपारिक पद्धतीने करू लागले आहेत. शेतात कष्ट करून पिकांना म्हणावा तेवढा मोबदला मिळत नाही. त्यामुळे शेती करणे परवडत नाही, असे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरच यांत्रिक शेतीचा केंद्रबिंदू बनत चालला आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी मोजक्यात शेतकर्यांकडे ट्रॅक्टर व इतर यंत्रे होती. पूर्वी याचा वापरही मर्यादित केला जायचा. परंतु, आता पारंपरिक शेतीला फाटा देऊन काही शेतकरी अशी कामे करत आधुनिकतेची कास धरू लागला आहे.