पांडाणे । प्रतिनिधी :-संपुर्ण तालुक्यासह जिल्हाभर सतत महिनाभर चाललेल्या अवकाळीने चार पाच दिवसापासुन उसंती घेतल्याने रखडलेल्या खरीपाच्या मशागतींना काहीसा वेग आल्याचे चित्र परीसरात दिसत आहे.
संपुर्ण मे महिना अवकाळीने थैमान घातल्याने खरीपाच्या हंगामासाठी मशागतीचे गणित पुर्ण बिघडुन तोंडावर असलेल्या हगांमी पिकांसाठी धोक्याची घंटा समजले जात होते. काही शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा काढणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसुन येत होते. काहींना मजुर टंचाईची समस्या जाणवत असल्याने शेतातील कांदा पिक काढणीला उशिर झाल्याने अवाढव्य खर्च करुन पिकविलेला शेकडो एकरवरील लाखो रुपयांचा माल अवकाळीच्या पाण्यात बुडाला. त्यामुळे काहीका होईना होईल तितके प्रयत्न करून कांदा उत्पादक शेतकरी कांदा काढणीच्या कामातच अडकलेला दिसुन येत होता. त्याच कालावधीत मोठ्या प्रमाणावर कांदा, कोबी, फ्लॉवर, कारले, भोपळा, दोडका व इतर भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे आजच्या घडीला मशागतीसाठी ट्रॅक्टरची मजुरी आणि भुईमुग, सोयाबिन, मका किंवा टोमॅटोचे बियाणे खरेदी करणे मोठे जिकरीचे ठरत आहे. परंतु कोणत्याही परीस्थितीत पुढील पिकांसाठी मशागत करणे महत्वाचे असल्याने शेतकरी धावपळ करतांना दिसत आहेत.