बोरगाव l प्रतिनिधी:- सुरगाणा तालुक्यातील अनेक युवक व कुटुंबांना रोजगाराच्या अभावामुळे दररोज रोजगाराच्या शोधात तालुक्याबाहेर कळवण, दिंडोरी, पिंपळगाव, वणी, अभोणा, कनाशी परिसरात जीवघेणा प्रवास करून जावे लागत आहे. दैनंदिन प्रवासाचा त्रास, वाहतूक खर्च तसेच अपघातांचा धोका यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
स्थानिक पातळीवर उद्योग, शेतीपूरक व्यवसाय, बांधकाम तसेच रोजगार हमी योजना अशा स्वरूपातील रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यास हे स्थलांतर मोठ्या प्रमाणात थांबू शकते, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
तालुक्यात शासकीय योजनेतून लघुउद्योग, दुग्धव्यवसाय, हस्तकला, शेती प्रक्रिया उद्योग, तसेच युवकांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्यास ग्रामीण भागातच रोजगारनिर्मिती होऊ शकते.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तालुक्यातच रोजगार उपलब्ध करून दिल्यास स्थलांतराला आळा बसून स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.