maharashtratribalnews

वर्‍हाडींना फोडला घाम


दिंडोरी। प्रतिनिधी:- गेल्या काही दिवसांपासून दिवसेंदिवस पारा चढू लागल्याने त्यामुळे उन्हाचा तडाका वाढत आहे. वातावरणातही ढगाळ हवामानासह ऊन सावलीचा खेळ सुरू असल्याने शरीराची लाई लाई होत असून असह्य उकाड्याने नागरिक हैराण होत आहे. त्यातच लग्नसराईच्या तिथी अधिक असल्याने या रणरणत्या उन्हामुळे वर्‍हाडींना अक्षरश: घाम फुटला आहे. अनेक विवाह सोहळ्यांना हजेरी लावण्यासाठी नागरिकांना असह्य त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाचा पारा जोमाने वाढत असून, उन्हातान्हातून विवाहासाठी बालगोपालांपासून वर्‍हाडी मंडळी घामाघूम होत असल्याचे चित्र आहे. सध्या लग्नतिथी खुप दाट आहे. एप्रिल महिन्यात सहा ते सात दिवसांत सर्वाधिक विवाहसोहळे आहेत. एका गावात दिवसाकाठी तीन ते चार विवाह होत आहे. या विवाहासाठी पाणी आणण्याकरीता वधुकडील मंडळींची चांगलीच धावपळ होत आहे. अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे पाणी विकत घेवून वधुपित्याला लग्नविधी पार पाडावे लागत आहे. लग्नतिथी दाट असल्याने वधू-वराकडील मंडळी वधु-वरांसाठी बाजारपेठेत कपडे, भांडे व सोने खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करीत असल्याने दुकाने हाऊसफुल आहेत. मात्र वाढत्या तापमानामुळे वर्‍हाडी मंडळीची दमछाक होत आहे. सकाळ- संध्याकाळ परिसरातील कोणत्याही ठिकाणी जात्यावर म्हटले जाणारे ‘सई बाई गं बाई ’ हे गाणे कानावर पडणारच याशिवाय मिरवणुकांमध्ये ढोल-ताशे डिजे आदींच्या गजराने परिसर दणाणुन जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने